अजि सोनियाचा दिनु । वर्षे अमृताचा घनु ॥
हरि पाहिला रे । सबाह्याभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी ॥
कृपासिंधु करुणाकरू । बाप रखमादेविवरू ॥
दृढ विटे मन मुळी । विराजित वनमाळी ॥
बरवा संतसमागमु । प्रगटला आत्मारामु ॥
हरि पाहिला रे हरि पाहिला रे ।

आम्ही काय कुणाचे खातों । श्रीराम आम्हाला देतो
बांधिले घुमट किल्ल्याचे तट । तयाला फुटती पिंपळवट
नाहीं विहीर आणी मोट । बुडाला पाणी कोण पाजीतो
खडक फोडितां सजिव रोडकी । पाहिली सर्वांनी बेडकी
सिंधु नसता तिये मुखीं । पाणी कोण पाजीतो
नसतां पाण्याचे बुडबुडे । सदासर्वदा गगन कोरडें
दास म्हणे जीवन चहुंकडे । घालुनी सडे पीक उगवितो

कैवारी हनुमान, आमुचा ॥
पाठीं असतां तो जगजेठी । वरकड काय गुमान
नित्य निरंतर रक्षी नानापरी । धरूनिया अभिमान
द्रोणागिरि करि घेउनि आला । लक्ष्मणप्राणनिधान
दासानुदासा हा भरंवसा । वहातसे त्याची आण

आरंभी वंदीन अयोध्येचा राजा | भक्ताचिया काजा पावतसे ||||
पावतसे महासंकटी निर्वाणी | रामनाम वाणी उच्चारीता ||||
उच्चारिता नाम होय पापक्षय | पुण्याचा निश्चय,पुण्यभूमी ||||
पुण्यभूमी पुण्यवंतासी आठवे |पापिया नाठवे काही केल्या ||||
काही केल्या तुझे मन पालटेना | दास म्हणे जना,सावधान ||||

येथे कां रे उभा श्रीरामा । मनमोहन मेघश्यामा ॥
काय केली सीतामाई । येथे राही रखुमाई ॥
काय केली अयोध्यापुरी । येथे वसविली पंढरी ॥
काय केली शरयू गंगा । येथे आणिली चंद्रभागा ॥
धनुष्यबाण काय केले । कर कटावरी ठेविले ॥
काय केले वानरदल । येथे मिळविले गोपाळ ॥
रामीरामदासी भाव । तैसा होय पंढरिराव ॥

राजस सुकुमार मदनाचा पुतळा| रविशशिकळा लोपलिया||
कस्तुरी मळवट चंदनाची उटी| रूळे माळ कंठी वैजयंती||
मुगुट कुंडले श्रीमुख शोभलें| सुखाचे ओतले सकळ ही||
कासे सोनसळा पांघरे पाटोळा| घननीळ सांवळा बाइयानो||
सकळही तुम्ही व्हा गे एकीसवा| तुका म्हणे जीवा वीर नाही||

नामाची आवडी तोचि जाणा देव| न धरी संदेह काही मनी||
ऐसे मी हे बोलत नाही नेणतां| आनुनि संमता संतांचिया||
नाम म्हणे तया आणीक साधन| ऐसे हे वचन बोलों नये||
तुका म्हणे सुखे पावे य वचनी| ज्याचीं शुद्ध दोन्ही मायेबाप||

येथोनी आनंदू रे आनंदू । कृपासागर तो गोविंदू रे ॥१॥
महाराजाचे राऊळी । वाजे ब्रम्हानंद टाळी ॥२॥
लक्ष्मी चतुर्भुज झाली । प्रसाद घेऊन बाहेर आली ॥३॥
एका जनार्दनी नाम । पाहता मिळे आत्माराम ॥४॥

सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ॥१॥
तुळसीचे हार गळां कासे पीतांबर । आवडे निरंतर तें चि रूप ॥ध्रु.॥
मकरकुंडलें तळपती श्रवणीं । कंठीं कौस्तुभमणि विराजित ॥२॥
तुका म्हणे माझें हें चि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीनें ॥३॥
रुपे सुंदर सावळा गे माये वेणु वाजवी | वृंदावना गोधने चारिता ॥१॥
रुणझुण वाजवी वेणु | वेधी वेधले आमुचे तनमनु ओ माये ॥२॥
गोधने चारी हती घेऊन काठी |वैकुंठीचा सुकुमार गोपवेषे जगजेठी
वैकुंठीचा सुकुमार गोधने चारीताहे ॥३॥
एका जनार्दनी भुलवी गौळणी | करीती तनुमनाची वोवाळणी वो माये ॥४॥
कन्या सासुरासी जाये,मागे परतोनी पाहे|तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसी केशवा||चुकिलया माये, बाळ हुरुहुरु पाहे|जीवनावेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी||
सावळे सुंदर रूप मनोहर । राहो निरंतर हृदयी माझे ॥१॥
आणिक काही इच्छा आम्हा नाही चाड । तुझे नाम गोड पांडुरंगा ॥२॥
जन्मोजन्मी ऐसे मागितले तुज । आम्हासी सहज द्यावे आता ॥३॥
तुका म्हणे तुज ऐसे दयाळ । धुंडिता सकळ नाही आम्हा ॥४॥
अमृताहूनि गोड नाम तुझे देवा। मन माझे केशवा कां बा नेघे ॥१॥
सांग पंढरिराया काय करू यांसी । का रूप ध्यानासी न येत तुझे ॥२॥
कीर्तनी बैसता निद्रे नागविले । मन माझे गुंतले विषयसुखा ॥३॥
हरिदास गर्जति हरिनामाच्या कीर्ति । नये माझ्या चित्ती नामा म्हणे ॥४॥
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरें । पक्षी ही सुस्वरे आरवीती ॥१॥
येणे सुखे रुचे एकांताचा वास । नाही गुण दोष अंगा येत ॥२॥
आकाश मंडप पृथ्वी आसन । रमे तेथे मन क्रिडा करी ॥३॥
कंथा कमंडलू देह उपचारा । जाणवितो वारा अवसरु ॥४॥
हरि कथा भोजन परवडी विस्तार । करुनी प्रकार रुची सेवू ॥५॥
तुका म्हणे होय मनासी संवाद । आपुलाची वाद आपणासी ॥६॥